चिपळूण : येथील डॉ. मनीषा वाघमारे यांनी बंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ. मीरा वेलणकर यांच्यासह टैंडम सायकलवरून प्रवास करून ४२ दिवसांत ७ राज्यांमधून ३८०० किमी हून अधिकचा प्रवास करत एक नवीन जागतिक विक्रम स्थापित केला आहे. भारताचे पूर्वेकडील पहिले गाव किबिथू येथून सुरू झालेला प्रवास अरुणाचल, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून होत भारताच्या पश्चिम टोकावरील कोटेश्वर येथे समाप्त झाला. या दोन्ही टोकांच्या दरम्यान या जोडगोळीने टँडम प्रकारची सायकल वापरून इस्ट टू वेस्ट असा सुमारे ३८०० किमीपेक्षा जास्त अंतर कापून जागतिक विक्रम नोंदवला आहे.
१५ मे रोजी किबिथू येथे इंडो तिबेट सौमा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेला झेंडा दाखवला आणि हा प्रवास सुरू झाला. अरुणाचल प्रदेशमधील या अत्यंत दुर्गम भागातील खडबडीत रस्ते, तीव्र चढ उतार, दरडींचा सामना करीत आसाममध्ये त्यांचा प्रवेश झाला, अरुणाचलमधील प्रवासाने सायकल नादुरुस्त झाली होती, तिची दुरुस्ती केली. आसाममधील काझीरंगा अभयारण्यातून अनेक प्राण्यांचे दर्शन झाले. पश्चिम बंगालची हद्द येईपर्यंत सायकलच्या विविध पार्टस् नी आपापली दुखणी काढली. पंक्चरने तर पाठच सोडली नव्हती. चिकन नेक असं वर्णन असलेल्या भारताच्या या भूभागाला नेपाळ, बांगलादेश, चीन आणि भूतान यांनी वेढलेले असल्याने इथे वैयक्तिक सुरक्षा हा सतत चिंतेचा विषय असतो. जगप्रसिद्ध रसगुल्ल्याचा आस्वाद घेत दोघींचा बिहारमध्ये प्रवेश झाला. इथे येईपर्यंत त्यांच्या सायकलची दुरवस्था झाली की आता दुरुस्तीऐवजी नवीन सायकल विकत घेणे अनिवार्य झाले. नवीन सायकल ताब्यात मिळेपर्यंत जुन्याच सायकलची ठिकठिकाणी दुरुस्ती करत त्यांनी बिहार राज्य पार केले. उत्तर प्रदेशमध्ये नव्या सायकलवरून दोघींनी कानपूरमार्गे आग्रा गाठले. आग्रा येथे वर्ल्ड अल्ट्रा सायकलिस्ट असोसिएशनच्या एका नव्या विक्रमाची नोंद केली.
बिहार, उत्तर प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्ये प्रवेश झाल्यानंतर उन्हाच्या कडाक्याने परिसीमा गाठली. राजस्थानमधून मोहिमेच्या अंतिम राज्यात म्हणजे गुजरातमध्ये प्रवेश झाला. उष्ण हवेच्या झळा, समोरून येणारा वारा, रखरखीत वाळवंटी प्रदेश ओलांडत कच्छच्या रणातील त्यांचा प्रवास तितकाच खडतर होता. दोन्ही बाजूस मिठाचा प्रदेश आणि मधून जाणारा रस्ता म्हणजे निव्वळ नयनसुख पण काही काळानंतर तेच त्रासदायक होऊ लागतं. निर्जन आणि आव्हानात्मक असा हा भूभाग पार करून पुढे आल्यावर आपण आपल्या उद्दिष्टाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात आलो आहोत या अनिवार आनंदात उर्वरित अंतर पार करून दोघी कोटेश्वर येथे पोहोचल्या.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून नोंद
किबिधू ते कोटेश्वर हे अंतर टँडम सायकलने पार करणाऱ्या पहिल्या महिला सायकलिस्ट हा विक्रम दोघींनी पूर्ण केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून डॉ. मनीषा व डॉ. मीरा यांच्या या विक्रमाची नोंद घेतली जात असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 02/Jul/2025














