Bachchu Kadu protest in Mumbai: बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन

Bachchu Kadu protest in Mumbai: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आपल्या ठाम शैलीत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिल माफीसाठी आज मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे.

7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही, अन्यथा उलटं टांगू, असा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जूनमध्ये आंदोलन केले होते. मोझरीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांनी उपोषण केले होते.

महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ती द्यावी अशी त्यांची मागणी होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कडू यांची मनधरणी करण्यासाठी पोहोचले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा शिष्टाई केली होती. राज्य शासनाने यावर एक समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होती. त्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले. मात्र समिती स्थापनेस होत असलेली दिरंगाई लक्षात घेता त्यांनी 7 जुलैपासून पुन्हा पदयात्रा काढण्याचा इशारा दिला. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर तीन जुलैला मंत्रालयात बैठक लावण्यात आली आहे. महसूलमंत्री बावनकुळे बैठकीला उपस्थित राहतील.

महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली

दुसरीकडे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं संकट पुन्हा एकदा गंभीर बनलं आहे. यंदा 1 मार्च ते 31 मे 2025 या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केली असून, मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा भागातील जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. आर्थिक अडचणी, नापिकी, कर्जाचा बोजा आणि विमा भरपाईचा अभाव यामुळे शेतकऱ्यांवर असह्य ताण निर्माण झाला आहे. लातूर, यवतमाळ, अकोला, बीड, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यांत आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, कृषी विभागाने सुसंगत मदत योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं असून, आत्महत्येची कारणमीमांसा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 04-07-2025