मंडणगड : खासगी मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेच्या युगात शासनाच्या बीएसएनएल कंपनीच्या सर्व सेवा तालुक्यात मागे पडल्याचे चित्र आहे. तालुक्यातील वेळास, देव्हारे, बाणकोट, लाटवण व म्हाप्रळ या मुख्य आर्थिक क्रिया असलेल्या गावांमध्ये अद्यापही ४जी नेटवर्कच देण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुरेशा रेंजअभावी ऑनलाइन कामांना फटका बसतो आहे.
खासगी कंपन्या तालुक्यात मोबाईलला ४जी नेट देत आहेत. डोंगराळ व ग्रामीण भागातही कालसंगत ५जी नेट देण्यासाठी तालुक्यात कार्यरत सर्व कंपन्या प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे बीएसएनएल वापरकर्त्यांना आजही ४जी व ३जी नेटसेवा पुरवली जात आहे. ऑप्टिकल फायबर कनेक्टच्या माध्यमातून बीएसएनएल कंपनी पूर्ण तालुक्यात पोहचली आहे. मनुष्यबळ, जागा, साधने यांची पर्याप्त उपलब्धता असतानाही कालसंगत सेवा देण्यास कंपनी कमी पडली आहे. मंडणगड शहराचा परिसर वगळता ग्रामीण भागात बीएसएनएल वापरकर्त्यांना रेंजच मिळत नाही. तालुक्यात २००५ पासून मंडणगड, दहागाव, लाटवण, शेनाळे, म्हाप्रळ, पंदेरी, देव्हारे, बाणकोट, जावळे, पाले, पालवणी, वेळास या गावात कंपनीचे मोबाईल टॉवर उभे करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात तुळशी, घोसाळे, आंबडवे, निगडी, गोठे, सावरी, कुडुकखुर्द, आतले, तोंडली, शेवरे, टाकवली, ढांगर, पेवे या गावात मोबाईल टॉवर उभे करण्यात आले. याचबरोबर नव्याने विन्हे, भोळवली, माहू, केंगवळ, रानवली, कोन्हवली, आसावले या गावात मोबाईल टॉवर प्रस्तावित करण्यात आले आहेत. जुन्या-नव्या सर्व टॉवरची रेंज मर्यादित आहे. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. विविध कारणांनी टॉवर वारंवार बंद पडतात व त्यांचे दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कंपनीच्या सेवा वापरकर्त्यांमध्ये सातत्याने घट होत आहे.
सावरी गावात नव्याने मोबाईल टॉवर उभारण्यात आला; मात्र रेंजच मिळत नाही. खाडीपलीकडील दुसऱ्या गावांतील रेंज मिळते; पण गावातील मिळत नाही. परिणामी, ऑनलाइन कामे होत नसून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे- शैलेश घोसाळकर, ग्रामस्थ
केवळ ६ टॉवरमध्येच सुविधा
तालुक्यात सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या कंपनीच्या पूर्वी चालू असलेल्या १२ मोबाईल टॉवरपैकी केवळ ६ मोबाईल टॉवर ४जी नेटवर्क आहे. यातील वेळास, देव्हारे, बाणकोट, लाटवण व म्हाप्रळ या मुख्य आर्थिक क्रिया असलेल्या गावांमध्ये ४जी नेटवर्क देण्यात आलेले नाही. वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ गावातील मोबाईल टॉवरना ४जी नेटवर्क देण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे; मात्र रेंजमध्ये सातत्य नसल्याचे त्या त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 04/Jul/2025














