रत्नागिरी : उद्यमनगर येथे तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी : तीन मुली झाल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण तसेच तलाक बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न करत माहेरहुन पैशांची मागणी केली. याप्रकरणी पतीसह सासू-सासरे व अन्य एक महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2016 ते 23 ज्ाून 2025 या कालावधीत उद्यमनगर पटवर्धनवाडी फोडकर कॉम्प्लेक्स व कोकणनगर येथे घडली आहे.

सुहेब शाहिद मणेर (35),शाहिद फकू मणेर (58), रफिया शाहिद मणेर (51) आणि सुहेमा ताहिरअली खान (31,सर्व रा.अल अमीर टॉवर उद्यमनगर पटवर्धनवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात नरगीस सुहेब मणेर (33,रा.इकरा इंग्लीश स्कुलजवळ कोकणनगर,रत्नागिरी) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, संशयित आरोपींनी सन 2016 ते 23 जून 2025 या कालावधीत फिर्यादी विवाहितेला माहेरवरुन पैसे घेउन ये अशी पैशांची मागणी केली. तसेच तीन मुली झाल्या याचा राग मनात धरुन पती सुहेबने तिला शिवीगाळ करत लाथाबुकक्यांनी मारहाण केली व वारंवार तलाक तलाक असे बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे फिर्यादीने राजापूर कोर्टात संशयितांविरोधात केलेली केस मागे घेण्यासाठी तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 85,115(2),352,3(5) मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायदा 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 04-07-2025