निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न : भाजप नेते आशिष शेलार

वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी एकाच मंचावर एकत्र आले. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

यानंतर आता भाजपाने यावर पलटवार केला आहे. “भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच… निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न!” असं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. “भाषेसाठी नाही ही तर.. निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी! महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता “भाऊबंदकी” आठवली… ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.”

“भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच… आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार… त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे… निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब “तहात” जिंकण्याचा प्रयत्न!” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

“म मराठीचा नाहीच… सत्तेचाच. गेले अनेक दिवस दोन भाऊ एकत्र येणार… म्हणून सुरू असलेला अंक एकदाचा आज उघडला… आणि या दोघांकडून अपेक्षा असणाऱ्याच्या मनांत निराशाच आली कारण मराठी, मराठी भाषा याबद्दल काय होतं या कार्यक्रमात? वाजत गाजत दोन्ही भाषण झाली पण या भाषणात…

▪️मराठी साठी काही कार्यक्रम? उत्तर नाही
▪️मराठी भाषेच्या विकासासाठी काही धोरण ? उत्तर नाही
▪️मराठी युवकाला प्रगती साठी काही दिशा दर्शक? उत्तर नाही

उद्धव ठाकरेंचं भाषण तर नेहमीच टोमणे मारणारं, भाजपावर, मोदीजींवर टीका करणारं होतं. शेवटी तर त्यांनी कबुली पण दिली महापालिकेसाठीच नाही तर महाराष्ट्रातसुद्धा जिंकण्यासाठी आम्ही एकत्र आलो” असं भाजपाच्या केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 05-07-2025