चिपळूण : एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांकडून आपण जागा घेत असतो, हे लक्षात ठेवून शेतकऱ्यांचे हित पहायला हवे. त्यांना आवश्यक असणारे रस्ते, पूल याबाबतचे प्रस्ताव तयार करा. पावसाळ्यांमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण करा. पावसाळ्यानंतर काम सुरु झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचना देतानाच गाणे खडपोली रस्ता डाबरीकरणासाठी २ कोटी, याच मार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पुलासाठी २० कोटी आणि कालव्यावरील पुलासाठी ५ कोटी असे २७ कोटी देत असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
चिपळूण येथील सहकार भवनामध्ये पालकमंत्री डॉ. सामंत यांनी खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीला माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुभाष चव्हाण, उद्योजक प्रशांत यादव, सूर्यकांत खेतले, उमेश सकपाळ, सपना यादव, संजय मोरे, स्मिताताई चव्हाण आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, खेर्डी एमआयडीसीमध्ये उत्पादन होत नसेल, तर भूखंड काढून घ्यावीत. खडपोली एमआयडीसीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करावी. प्रक्षण नियंत्रण मंडळाने जे उद्योजक प्रक्षण नियंत्रण करत नाहीत, जे ऐकत नाहीत अशा उद्योगांचा सर्वे करुन त्यांना नोटीस द्यावी. कंत्राटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी तहसिलदारांनी बैठक घेऊन समज द्यावी. त्यांनी किमान वेतन मिळते की नाही याबाबत खात्री करावी, प्रकल्पग्रस्तांच्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक पोफळी प्रकल्पाग्ग्रस्तांचे विविध विषय मार्गी लावण्यासाठी विशेषतः ९ हजार जणांना नोकरी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घ्यायला लावू त्यामध्ये कोयनेच्या संदर्भातील विस्तृत प्रश्नांबाबत चर्चा करुन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महावितरणने ११ केव्हीच्या लाईन वरुन वीज वितरण करण्यासाठी ८ दिवसात प्रस्ताव सादर करावा. डीपी लावण्यासाठी २५ लाख रुपये दिले जातील. महानिर्मितीने प्रकल्पग्रस्तांच्या गरीब लोकांच्या मुलांसाठी गाडी सुरु करावी, जलसिंचन विभागाची रत्नागिरीत बैठक लावली जाईल. त्याबाबत पूर्ण अभ्यास करुन परीक्षेला यावे. या परीक्षेत पास व्हायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी खेर्डी एमआयडीसीमध्ये महिला प्रभाग संघाला वाटप करण्यात आलेल्या भूखंडाचे पत्र देण्यात आले.
‘चिपळूण नागरी’चा अभिमान पाहिजे
पालकमंत्री ज्या पद्धतीने चिपळूण नागरी सह पतसंस्था चालवली जाते त्याचा अभिमान जिल्ह्यातल्या प्रत्येक सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असला पाहिजे. अडीच हजार कोटीची पतसंस्था ही कशी आदर्शवत पद्धतीने चालवायची असते, याचे मूर्तीमंत उदाहरण आज मी बघितलं. रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, पनवेलमध्येदेखील अतिशय चांगल्या पध्दतीचे या पतसंस्थेच्या सभागृहासारखे सभागृह नाही, असे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. सामंत यांनी काढले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 08/Jul/2025














