रत्नागिरी : आम्ही वर्षानुवर्षे कळझोंडी येथे राहत आहोत. त्यावर घाला घालू नका. आमचा विकास करायचा असेल तर पर्यटनातून करा, आंबा-काजू शेती विकासाच्या माध्यमातून करा. पोलिस व प्रशासनाने दडपशाही केली गेली तर आम्ही गुरे, जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बसू, असा इशारा कळझोंडी ग्रामस्थांनी दिला.

कळझोंडी गावातील ग्रामस्थांच्या वैयक्तिक आक्षेपांची सुनावणी काल सकाळी झाली. जिजाऊ संघटनेने दिलेल्या अर्जावर स्वाक्षरी असणाऱ्या ग्रामस्थांची सुनावणी सायंकाळी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात ही सुनावणी झाली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सांगितले की, आमच्या जागा वाचविण्यासाठी निकराचा लढा देत आहोत. आमचे साधे तीन प्रश्न आहेत आम्ही आंबा, काजू बागायतदार आहोत. तेथे पर्यटन विकसित होत आहे. कारण आमच्याकडून कोस्टल हायवे विकसित होत आहे. आमच्या करोडो रुपयांच्या जागा कवडीमोल भावाने का द्यायच्या, हा प्रश्न आहे. विकासाच्या बाबतीत हे काही सांगत आहेत, त्यातून स्थानिकांना फारसे रोजगार उपलब्ध झालेले नाहीत. उद्योगधंदे विकसित होतील म्हणून २२०० एकर जागा घेतली जात आहे. मात्र, कोणते प्रकल्प येणार याचे प्रशासनाकडे उत्तर नाही. आम्ही वर्षानुवर्षे त्या ठिकाणी राहत आहोत, त्यावर घाला घालू नका. पोलिस व प्रशासनाने दडपशाही केली गेली तर आम्ही गुरे, जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बसू.
जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सायंकाळी झालेल्या या सुनावणीला मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विरोध आहे. दलाल, राज्यकर्ते, नेत्यांच्या कार्यकत्यांचे हित आहे हे दिसून येत आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे काहीच स्पष्ट उत्तरे नाही आहेत. आमच्या जागा घेऊन एमआयडीसी नंतर करोडो रुपयांना विकणार. त्यापेक्षा आम्हीच त्या करोडो रुपयांना विकू, असेही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, पुढील वैयक्तिक सुनावण्या या प्रांताधिकारी कार्यालयतच होणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीची भूमिका अस्पष्ट
वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची भूमिका स्पष्ट नाही. एमआयडीसीला कवडीमोल भावाने जागा का विकावी, असे मत कळझोंडी ग्रामस्थांनी मांडले. त्याचप्रमाणे याठिकाणी शासनाने कंपनी आणण्यापेक्षा पर्यटन विकासावर शासनाने भर द्यावा, असेही ग्रामस्थांनी सुनावणीत आपले मत मांडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 08/Jul/2025














