Arvind Kejriwal:दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्काराची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, जोपर्यंत दिल्लीत आमचे सरकार होते, तोपर्यंत आम्हाला काम करण्याची परवानगी नव्हती, तरीही आम्ही काम केले.
मला वाटते की, मला यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील मोहाली येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान हे विधान केले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे अनेक नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान सरकार आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही त्यांना त्यासाठी नामांकित केले आहे.
उपराज्यपालांच्या अडथळ्यांना न जुमानता, दिल्लीत काम झाले – केजरीवाल
अरविंद केजरीवाल म्हणतात, आम्ही उपराज्यपालांच्या अडथळ्यांना न जुमानता, दिल्लीत खूप काम केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आम्ही इतक्या अडचणींमध्ये दिल्लीत मोहल्ला क्लिनिक बांधले. भाजपच्या महानगरपालिकेने बुलडोझर पाठवून पाच मोहल्ला क्लिनिक पाडले. गेल्या वर्षी जूनमध्ये, जेव्हा तापमान ५० अंश सेल्सिअस होते, तेव्हा एक मिनिटही वीजपुरवठा खंडित झाला नव्हता, परंतु आता वीजपुरवठा खंडित होत आहे. भाजपने दिल्ली उद्ध्वस्त केली. ते राजकारण करत आहेत, त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. आप सरकारने एलजीच्या अडथळ्यांना न जुमानता इतके काम केले. मला दिल्लीत सरकार चालवल्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी इच्छा केजरीवालांनी व्यक्त केली.
दोन वर्षांपूर्वी देखील केजरीवाल नोबेलची इच्छा व्यक्त केली होती
केजरीवाल यांनी पहिल्यांदाच नोबेल पुरस्काराची इच्छा व्यक्त केली नाही. त्यांनी यापूर्वीही म्हटले होते की, ते नोबेल पुरस्कारास पात्र आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, दिल्ली सरकारच्या कामात एलजी अडथळे निर्माण करतात, तरीही मी इतके काम केले आहे की, मला नोबेल पारितोषिक मिळावे.
प्रशासनासाठी नोबेल पारितोषिक आहे का?
अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1901 मध्ये नोबेल पारितोषिक सुरू करण्यात आले. आतापर्यंत, विविध श्रेणींमध्ये 1025 व्यक्ती आणि संस्थांना 627 वेळा हा पारितोषिक देण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांती आणि आर्थिक विज्ञान अशा सहा श्रेणींमध्ये नोबेल पारितोषिक दिले जाते. अरविंद केजरीवाल ज्या श्रेणीसाठी इच्छा व्यक्त करत आहेत, त्याचा नोबेल पारितोषिकात समावेश नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 09-07-2025














