रत्नागिरी : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चौदा वर्षे रखडले असले तरी आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन टप्प्याच्या ठेकेदारांना अजून मुदतवाढ हवी आहे; परंतु केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मार्च २०२६ या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्ती केली आहे. काम लांबल्याने मुळ अंदाजपत्रकापेक्षा सुमारे ३० टक्के कामात वाढ होणार आहे.
अंदाजित दोन्ही टप्प्यांना प्रत्येकी २५० ते ३०० कोटी वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये गडकरी यांनी ठेकेदारांना चांगल्या शब्दात कान उघडणी केली आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग पूर्ण करण्याकडे आपले अधिक लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करणे हा एकमेव अजेंडा आहे.
चौदा वर्षे काम अपूर्ण असल्याने शासनाला विरोधक आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी दौरा करत आहेत. अनेक मंत्र्यांनी दौरे केले, पाहणी केली, परंतु हा मार्ग काही पूर्ण होण्याचे नाव घेईना. अनेक डेडलाईन दिल्या परंतु त्या देखील या मार्गाने खोट्या ठरवल्या. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्याचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या, परंतु काम काही पूर्ण झालेले नाही. विशेष करून आरवली ते कांटे हा ३९ किमीचा टप्पा आहे. सुमारे ६९२ कोटीचे काम आहे.
परंतु अजुन ते अपूर्णच आहे. तर दुसरा टप्पा कांटे ते वाकेड हा ४९ किमीचा असून त्याचे अंदाजपत्र ८०० कोटीचे आहे. दोन्ही टप्प्यांचे काम अजून अपूर्ण आहे. या दोन्ही टप्प्यांना पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदरांनी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. परंतु गडकरी यांनी मागणी फेटाळून लावली आणि आहे त्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे अपूर्ण राहिलेले हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. रखडलेल्या या कामामुळे त्या कामाची अंदाजपत्रामध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे समजते. वाढलेले स्टील, भूसंपादन, मजूरी आदीचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आरवली ते कांटेमध्ये या टप्प्याला ३०० तर कांटे ते वाकेड टप्प्याला २५० कोटी वाढीव रकमेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
तीन मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव द्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील आणखी तीन मार्गांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव देण्यास सांगितला आहे. हे मार्ग दुपदरी आहेत, त्यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यामध्ये सावंतवाडी ते आंबोली, तरळे ते गगनबावडा आणि गुहागर ते चिपळूण या मार्गांचा समावेश आहे. सुमारे ४० किमीचे हे मार्ग आहेत. एक किमीला सुमारे २० कोटी या प्रमाणे सुमारे १२०० कोटी रुपये या तीन मार्गांना लागणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकामला दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 11/Jul/2025














