पावसाळी अधिवेशन: अजित पवार-भास्कर जाधव यांच्यात निधी वाटपावरून खडाजंगी

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुहागर येथील पुतळा उभारणीसाठी निधी देण्यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली. आमदार जाधव यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निधीवाटपाच्या मुद्द्यावरून अर्थमंत्री पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पुरवणी मागण्यांवर बोलताना जाधव यांनी पवार यांच्या वित्त विभागाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा, हे अर्थमंत्री ठरवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करू नका, असे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर पवार यांनी पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अर्थमंत्रीच जर निधी देणार असतील तर मग अर्थसंकल्प मांडता तरी कशाला? अर्थसंकल्पातल्या तरतुदींना काही अर्थ आहे की नाही? यापूर्वी कोणी अर्थमंत्री झाले नव्हते काय ? अशा शब्दात जाधव यांनी पवार यांना लक्ष्य केले. त्यावर पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, इतरांनी उपदेश करण्याचे कारण नाही. सभागृहात सगळ्यांनाच आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. बुधवारी सभागृहात नसताना जाधव हे काय म्हणाले, याविषयी मला सांगण्यात आले. आमचे सरकार तीन पक्षाचं आहे. मला इतकच सांगायचं आहे की, भास्कर जाधव आपण कोणत्या कोणत्या विभागाला किती निधी दिलेला आहे हे जरा पाहा.

जाधव यांनी सांगितले, त्यांच्या गुहागर येथील मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारायचा आहे. यासाठी मी अजित पवारांना पत्र दिलं; पण यावर पवार होय देखील बोलले नाहीत, नाही ही देखील बोलले नाहीत म्हणूनच मी नाराज आणि अस्वस्थ झालो. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, भास्कर जाधव यांच्या आतापर्यंत सहा टर्म पूर्ण झाल्या आहेत आणि ही सातवी टर्म सुरू आहे. या इतक्या टर्ममध्ये ते मंत्री होते. ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीदेखील होते. मग इतक्या वर्षांमध्ये चिपळूण आणि गुहागरसारख्या भागांमध्ये प्रतिनिधित्व करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा का उभा केला नाही? मला ते काही कळलं नाही.

भास्कर जाधव यांनी अर्थखात्याचे ते मालक आहेत का? अर्थमंत्री कोणाला पैसे देणार, हे कसं ठरवू शकतात? अर्थमंत्री स्वतःला कोण समजतात ? त्यांनाही माहिती आहे की, अर्थखाते सगळ्यांना निधी देतं. त्याच्यावर अजित पवारांची सही असली तरी एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सही असते. एकदा निधीचे वाटप झाल्यानंतर त्या खात्याच्या मंत्र्यांना अधिकार असतो की, कोणाला किती निधी द्यायचा; पण भास्कर जाधवांनी हे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. याला प्रतिउत्तर देताना मी स्वतःला कोणीही समजत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री आहे. जो मला अधिकार मंत्रिमंडळाने दिला आहे त्याच्या बाहेर मी जात नाही. महाविकास आघाडीमध्येही मी काम केलं आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर कसं घेऊन जायचं, याचं आम्हाला ज्ञान आहे. त्यामुळे इतरांनी उपदेश करण्याचे कारण नाही. कुणाचा तरी राग माझ्यावर काढण्याचे कारण नाही. मला कुणालाही दोष द्यायचा नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 11/Jul/2025