रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या मिऱ्या-नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना बायपास रस्ता नसल्याने नागरिक व वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. खोदलेल्या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. आंबाघाट ते साखरपा, नाणीजदरम्यान कामे अर्धवट स्थितीत असल्याने काही ठिकाणी दरडी कोसळून मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. हा महामार्ग मिऱ्या-नागपूर शक्तिपीठ या नावाने रत्नागिरीला जोडण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यात आला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम रवी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. आंबाघाट ते पाली रत्नागिरी या मार्गावरील काही ठिकाणी या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र या कंपनीने रस्ता पूर्ण करण्याबरोबर मार्गावर असलेल्या गावांना बायपास रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.
त्यामुळे गावातील नागरिकांना वाहनांच्या वर्दळीतूनच मार्ग काढत रस्ता ओलांडून जावे लागत आहे. मार्गावरील साखरपा येथील बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्याला बायपास रस्त्याची सुविधा नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे येथील देवळेफाटा ते आंबाघाटाच्या पायथ्यापर्यंत महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच खोदलेल्या रस्त्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कामाचा वेग मंदावला आहे. साखरपा तसेच नाणीजसारख्या महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी बायपास रस्त्याचे काम आधी पूर्ण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आंबाघाट ते पालीपर्यंतचा संपूर्ण रस्ता घाटमाथ्याचा असल्याने येथे दरडी कोसळण्याची भीती आहे. गतवर्षी देवळे परिसरात झालेल्या चिखलामुळे प्रवाशांनी भरलेली बस दरीत जाता जाता थोडक्यात वाचली होती.
टोलनाके उभारण्याची घाई
मिऱ्या-नागपूर शक्तिपीठ महामार्ग लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत; मात्र या महामार्गाचे काम पूर्ण करण्याऐवजी टोलनाके उभारण्याची घाई केली जात असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाची पावसाळ्यात झाली दुरवस्था पाहता हे काम लवकरच पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
साखरपा येथे मोठी बाजारपेठ असताना येथील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करणे गरजेचे असताना ते अर्धवट आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे. – सचिन पाष्टे, ग्रामस्थ, साखरपा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 11/Jul/2025














