गुहागर : समुद्री शेवाळ शेतीतून स्थानिक समुदायासाठी रोजगार निर्मितीची संधी

गुहागर : समुद्री सेवाळ शेतीमुळे स्थानिक समुदायासाठी रोजगार निर्माण होऊन स्थानिक पातळीवर आर्थिक प्रगती साधता येते, असे प्रतिपादन जलजीविकेचे प्रकल्प व्यवस्थापक चिन्मय दामले यांनी केले. गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ येथे रिलायन्स फाउंडेशन, जलजीविका संस्था व सहायक आयुक्त मस्त्य व्यवसाय यांच्यातर्फे समुद्री शेवाळ पालनाविषयी जागृती कार्यक्रम मच्छीमार बंधू आणि भगिनीसाठी घेण्यात आला. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनमार्फत देण्यात येणाऱ्या सागरी हवामानाची माहिती, संभाव्य मत्स्यसाठा क्षेत्र आदींबाबत माहिती देण्यात आली.

शेवाळाचे महत्त्व, समुद्री शेवाळ संवर्धनातून व्यवसायाच्या संधी, समुद्री शेवाळाचे व्यवस्थापन, राफ्ट बांधणीचे प्रात्यक्षिक राज पवार व सृष्टी सुर्वे यांनी दाखवले. परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी मच्छीमारांनी समुद्री शेवाळाची माहिती घेऊन आपल्या क्षमतेनुसार प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करावा तसेच विभागाच्या अन्य योजना व पावसाळी मासेमारीचे बंदीचे महत्व सांगितले.

जास्तीत जास्त मासेमारांनी अपघात गट विमा व एनएफडीबी पोर्टलवरील नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी मच्छीमारांना समुद्री शेवाळ जोडधंदा म्हणून कसा उपयुक्त आहे, याची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 12/Jul/2025