मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड; मांडकी येथील खांबे कुटुंबाचा यशस्वी प्रयोग

सावर्डे : वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत मांडकी (ता. चिपळूण) येथील अनंत खांबे या शेतकऱ्याने सर्वापुढे आदर्श ठेवला आहे. केवळ वर्षातून येणाऱ्या एका पिकावर समाधानी न राहता मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन, भाजीपाला, फळबाग यांची जोड दिली. यामधून खऱ्या अर्थाने शेतीला उद्योग व्यवसायाचा दर्जा मिळवून दिला आहे. यामध्ये त्यांनी नव्या पिढीलाही सामावून घेतले आहे.

वडिलोपार्जित जमीन कसण्याबरोबरच जमिनीत आलेला शेतमाल बाजारात विकण्यापर्यंतची कामे खांबे कुटुंबीय एकत्र करतात, त्यांच्या या एकत्रित कुटुंबात २० सदस्य आहेत. शेतीसाठी त्यांना मनुष्यबळासाठी मोठा उपयोग होतो. बाहेरून मजूर आणावे लागत नाहीत. भातशेती, फळबाग, भाजीपाला, नाचणी शेतीसाठी शासकच्या माध्यमातून बी-बियाणे, खते याचा शेतीसाठी पुरवठा होतो.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काजूची ३०० रोपे लावाली आहेत. यापूर्वी नारळ लावला असून, त्यासाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. पॉवरव्हिडरसाठी अनुदान घेतले. वडिलांच्या काळात २० गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस निर्मिती करून त्यामधून जरबेराचे उत्पादन केले आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत ७लाख ५० हजार रुपये अनुदान मिळाले. रत्नागिरी ८ या जातीच्या भाताची तसेच अन्य जातीच्या भावाची लागवड त्यांनी केली आहे.

भातशेतीनंतर भाजीपालाची शेतीही केली असून, त्यात वांगी, कलिंगड, चवळी, पावटा, लाल माठ आदर्याची लागवड केली आहे. ही भाजी सावर्धा, आरवली, वहाळ, खेडी, संगमेश्वर, माखजन या बाजारात ते स्वतः विक्री करतात. दोन हजार भाजीच्या जुड्या एकट्या सावर्डे बाजारात विकल्पाचे खांबे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बाजारामधील असलेली मागणी लक्षात घेउन मार्केटिंगचे तंत्र निश्चित केसे आहे. लवकर येणारे उत्पादने घेऊन त्याची विक्री तंत्र हे यशस्वी शेतीचे तंत्र आहे. त्यामधून पाच रुपयांची जुडी वीस रुपयांपर्यंत विकली जाऊ शकते. ही सर्व शेती ते सेंद्रिय पद्धतीने करत आहेत.

माझी तसेच भावाची मुले उच्चशिक्षित आहेत त्यांनी सुचवलेली नवी संकल्पना घेऊन सध्या कृषी पर्यटनावर भर दिला आहे. शेततळ्यात मत्स्योत्पादन आणि जोडीला तिथेच पर्यटकांना मासेमारीचा आनंद दिला जातो. त्यांना राहण्यासाठी झोपडीही आहे. ही कृषी पर्यटनाची संकल्पना आहे. तसेच आंबा, काजू, नारळ, भातासारख्या पारंपरिक शेतीबरोबरच कृषी पर्यटनातून रोजगार मिळत आहे. तसेच १ हजार पक्ष्यांचे कुक्कुटपालनही केले आहे-अनंत खांबे, मांडकी

खांबे यांनी शेतीला दिलेली पूरक व्यवसायाची आणि नवनवीन उपक्रमांची जोड ही खरोखरच अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ पावसाळी भात व वर्षातून येणारे आंबा, काजूचे वार्षिक उत्पन्न यावर समाधानी न राहता बाराही महिने शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन खऱ्या अर्थान शेतीला उद्योगाचा, व्यवसायाचा दर्जा द्यायला हवा. – प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 12/Jul/2025