साखरपा : मिऱ्या – नागपूर महामार्गाच्या कामांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील साखरपानजीक असणाऱ्या दख्खन गावात रहदारीसाठी योग्य जागा न ठेवल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मात्र, या परिसरातील ग्रामस्थांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने महामार्गच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन दिले आहे.
संगमेश्वर तालुक्यात मिऱ्या-नागपूर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील साखरपानजीक दख्खन गाव वसलेले आहे. एका बाजूला लोकवस्ती तर दुसऱ्या बाजूला शेती, बाजारपेठ यासह स्मशानभूमी आहे.
यासाठी ग्रामस्थांना महामार्ग ओलांडूनच यावे लागते. ग्रामस्थांच्या सोयीसुविधांचा विचार करून याठिकाणी महामार्गाचे काम करणे गरजेचे होते. मात्र, तसे न केल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे.
महामार्गाचे काम करताना पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत याठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी केली. ही मागणी ग्रामस्थांनी रेटून धरल्याने महामार्गच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 12/Jul/2025














