राजापूर : प्रवाशांकडून सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे कोकण रेल्वेला उत्पन्न मिळत असतानाही कोकण रेल्वेच्या मार्गावरील राजापुरातील सोल्ये येथील रेल्वेस्टेशनवर अद्यापही सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळत नाही. प्रवाशांसाठी सरकता जिनाही नाही. यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्यांसाठी गणेशोत्सवामध्ये सोल्ये येथील रेल्वेस्टेशनच्या येथे सामूहिक स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्धार पंचक्रोशी ग्रामविकास समितीने सभेमध्ये घेतला आहे.
पंचक्रोशी ग्रामविकास समिती या संस्थेची अनिल भोवड यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये संस्थेची नूतन कार्यकारिणीची निवड झाली अध्यक्षपदी विश्वास राघव, कार्याध्यक्षपदी संतोष जोगले, सरचिटणीसपदी संदेश मिठारी, खजिनदारपदी अनिल राऊत, तर सल्लागारपदी अनिल भोवड यांची निवड करण्यात आली.
सभेत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील सोल्ये येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासह प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना आदी सुविधांची उभारणी व्हावी, अशी गेल्या आठ वर्षांपासून समितीच्या माध्यमातून सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला जात आहे. मात्र, याची कोकण रेल्वेने दखल घेतलेली नाही. त्याबद्दल सभेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करताना गणेशोत्सवामध्ये सोल्ये येथील रेल्वेस्टेशन येथे सामूहिक स्वाक्षरी मोहीम राबवून निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पांगरे बुद्रूकमधील पाणी योजनेसाठी प्रयत्न
पांगरे बुद्रूक येथे उभारण्यात आलेल्या धरणातील पाणीसाठ्यावर आधारित जलजीवन योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. चौदा गावांसाठी लाभदायक ठरणाऱ्या या योजनेचे काम काही गावांतील तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. त्या गावची ग्रामपंचायत आणि कार्यकर्त्यांसोबत एकत्र चर्चा करून अडचणी दूर करून योजनेचे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 17/Jul/2025














