रत्नागिरी : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पडलेल्या अनियमित पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. मात्र गेल्या दोन दिवसात सुरू झालेल्या सरींनी बळीराजाच्या कामांना पुन्हा वेग आलेला आहे. यंदा ५१ हजार हेक्टरवर खरीपातील लागवडीचे लक्ष्य निश्चित केले होते. आतापर्यंत ३६ हजार ७२६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. तुलनेत ७६ टक्केच लागवड झाली असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांना बिघडलेल्या वेळापत्रकाचा त्रास सहन करावा लागत आहे.
मे महिन्यात पाऊस पडल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. परिणामी जिल्ह्यातील भाताच्या पेरण्या विलंबाने झाल्या. पुढे पावसाने पाच ते सहा दिवस विश्रांती घेतल्यामुळे लावणीत अडथळा जाला होता. त्याचबरोबर रोपांची व्यवस्थित वाढ झाली नसल्याने संगमेश्वरसह आजुबाजूच्या तालुक्यातील काही भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ आली होती. जुनच्या अखेरीस पावसाने जोर धरला होता. त्या कालावधीत काही शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या रोपांची लागवड करून घेतली होती.
जुलैमध्येही पावसाचा जोर संमिश्र होता. अधुनमधून सर पडून जात होती. दुपारी ऊन पडल्यामुळे भात लागवडीला शेतजमिनीत आवश्यक चिखल करणे शक्य होत नव्हते. काही शेतकऱ्यांनी विहीर, नदी-नाले यामधील पाण्याचा उपयोग करून भात लावणीची कामे आटपून घेतली. मात्र पावसाच्या पाण्यावर उपलब्ध असलेला आणि कातळ परिसरात पेरणी करण्यात आलेल्या भागातील पुनर्लागवड रखडली. आतापर्यंत ५१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार २६ हेक्तश्वरीला पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. अजूनही १४ हजार हेक्टरवरील लागवड करणे शिल्लक आहे. कालपासून जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा पावसाने जोर धरलेला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून पुढील काही दिवसात भात लागवड पूर्ण होईल असा अंदाज कृषि विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भात लागवड पूर्ण होते. मात्र, यंदा वातावरणाची स्थिती वेगळी होती. त्यामुळे भात लागवडीला विलंब झालेला होता: परंतु पुढील काही दिवसात शंभर टक्के लागवड होईल. विनोद हेगडे,- तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 17/Jul/2025














