रत्नागिरी : रास्त धान्य दुकान परवान्यासाठी इच्छुकांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या, राजीनाम्याने रिक्त झालेल्या व नव्याने मंजुरी देण्याच्या रास्त भाव धान्य दुकान परवाने यासाठी इच्छुकांनी ३१ जुलैपर्यंत आपल्या तहसील कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन प्र. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.

वर्षातून दोन वेळा जाहीरनामे काढण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाकडूल रास्त भाव धान्य दुकान परवाने, आज मितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, महसुली गावाप्रमाणे नवीन मंजूर रास्त भाव धान्य दुकान परवाने यांच्याकरिता जाहीरनामे प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये तालुकानिहाय जाहीरनामे मंडणगड ७, दापोली १४, खेड १५, गुहागर १४, चिपळूण १०, संगमेश्वर ४, रत्नागिरी २, लांजा १, राजापूर १० असे एकूण ७७ रास्त भाव धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत.

जाहीरनाम्यानुसार संबंधित तालुक्यातील इच्छुक ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या संस्थांनी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत आपले संबंधीत तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

अर्ज फी १० रुपये असून अर्जाचा नमुना तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. मुदतीत व परिपूर्ण कागदपत्रांसह दाखल झालेल्या प्रस्तावांचाच विचार केला जाणार असून, मुदतीनंतर व अपुऱ्या कागदपत्रासह प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 19/Jul/2025