रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र लोकमान्य टिळक हे अष्टपैलू व राष्ट्रीय नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चळवळ उभी केली. त्यांच्या स्वराज्याचा मंत्र घेऊन आताच्या पिढीने प्रेरणा घेऊन सुराज्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. लोकमान्यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी महाविद्यालयातर्फे आयोजित अभिवादन यात्रेत ते बोलत होते.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व गोगटे महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी या अभिवादन यात्रेचे आयोजन केले. भरपावसातही लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात यात्रेला शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत महेशबुवा सरदेसाई यांनी आरती केली.

महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनीनी गीतेतील अध्याय सादर केले. लोकमान्यांची आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, श्रीकांत भिडे, प्रशांत डिंगणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे आदींसह प्राध्यापक, एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

सलग विसाव्या वर्षी आयोजन
लोकमान्य आष्टपैलू व भारताचे राष्ट्रीय नेते होते. समाजकारणी, राजकारणी, संपादक, लेखक, गणिती तज्ज होते. गीतारहस्य ग्रंथ लिहिला. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पूरक कार्यक्रम राबवले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणत स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला. स्वदेशी चळवळ, स्वराज्य चळवळ, राष्ट्रीय शिक्षण चळवळ सुरू करून स्वातंत्र्याला पूरक वातावरण तयार केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठीच महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी आयोजन करण्यात आले असे डॉ. मकरंद साखळकर म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 24/Jul/2025