रत्नागिरी : वाटद एमआयडीसी; पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून आढावा

रत्नागिरी : तालुक्यातील प्रस्तावित वाटद एमआयडीसीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मोर्चा काढण्यात आला होता. आता शनिवारी एमआयडीसीच्या बाजूने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रदूषण विरहीत प्रकल्पाचे आणि शासनाची भूमिका ग्रामस्थांना समजावून सांगितली.

वाटद येथे येणाऱ्या एमआयडीसीला स्थानिकांचा पाठिंबा असून, काहीजणांकडून विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वाटद परिसरात मोर्चाही काढण्यात आला. यानंतर पाठिंबा असणाऱ्या ग्रामस्थांनी आता एमआयडीसीच्या बाजूने बैठकीचे आयोजन केले आहे. याठिकाणी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत हे येऊन ग्रामस्थांना वस्तुस्थिती सांगणार आहेत.

याचदरम्यान या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे आपले सहकारी उपविभागीय पोलिस अधीकारी नीलेश माईणकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, जयगडचे सहा. पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील हेही उपस्थित होते.

प्रथम जयगड पोलिस स्थानकात समन्वय बैठक घेऊन या भागाची पाहणी केली. त्यानंतर वाड्यावस्त्यावर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. अनेक ग्रामस्थांना प्रकल्पाविषयी काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. यावेळी शासनाची भूमिका पोलिस अधीक्षकांनी सांगितली.

अगदी छोटे ओहोळ, पऱ्यामधून, शेतशिवारामधून पोलिस अधीक्षकांनी जाऊन माहिती घेतली. छोट्या मुलांबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंदही त्यांनी लुटला. विशेषतः, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 25/Jul/2025