Maharashtra Rain: राज्यभर मुसळ’धार’; आज कोणत्या भागात कोणता अलर्ट जाणून घ्या सविस्तर..

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा (Rain) जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. सकाळी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अंधेरी सबवे सारख्या सखल भागात पाणी साचले होते. मात्र या पावसाचा मुंबईच्या वाहतूकीवर आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला नाही. पण पुढील 3 ते 4 तास हे महत्वाचे असून मुंबईसह इतर परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कोणत्या भागात पावसाचा इशारा

हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. मात्र, मराठवाड्यातील अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू असून आज पावसाचा जोर अधिकच वाढला असून उद्याही पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं प्रशासनाकडून शाळा महाविद्यालय तसेच अंगणवाड्या यांना सुट्टी जाहीर करण्यात आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर सध्या पालघरच्या पूर्व भागात पाऊस सुरु असून धरणांची पाणी क्षमताही पूर्ण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील मोठं पाणी क्षमता असलेलं सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण पूर्ण भरलं असून या धरणाचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणां मिळून सूर्या नदीमध्ये जवळपास 9400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं वेरुळ लेणी परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. लेणी परिसरातील सीता न्हानी धबधबा ओसंडून वाहत आहे.

परभणीत दिवसभर पावसाची हजेरी

परभणी शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे..अधून मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत असल्याने सर्वत्र कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. तर रस्त्यांवर वर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पिकांना मात्र या पावसामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या या रिपरिपीचा जनजीवनावरही परिणाम झाला आहे. तब्बल महिनाभर दडी मारलेल्या पावसाने नाशिकच्या नांदगाव, मालेगाव व मनमाड यासह पूर्व भागात श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पावसाअभावी करपू लागलेल्या खरीपांच्या पिकांना तूर्त जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 26-07-2025