रत्नागिरी : निवळीतील ‘त्या’ दोघांच्या मृत्यूप्रकरणी वायरमनवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर वायरमनच्या हलगर्जीमुळे दोन निष्पाप व्यक्तींना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसून जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेशी संबंधित वायरमनविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महावितरणने वायरमन आणि शाखा अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवळी येथे १७ जुलै २०२५ ला सायंकाळी ही घटना घडली होती. या प्रकरणी भोके येथील वायरमन दिलीप भिकाजी मायंगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित वायरमन दिलीप मायंगडे यांनी विजेच्या खांबावरील तुटलेली वाहिनी दुरुस्त न करता तिचा विद्युतप्रवाह तसाच चालू ठेवला होता. विशेष म्हणजे, झाडे तोडण्यासाठी ते स्वतः घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्याऐवजी त्यांनी तक्रादार यांची बहीण विदुलता वासुदेव वाडकर आणि चंद्रकांत यशवंत तांबे यांना झाडे तोडण्यास सांगितले. झाडे तोडत असताना या दोघांना तुटलेल्या वीज वाहिनीचा जोरदार धक्का लागला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. शांता वासुदेव वाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्युत विभागाच्या सुरक्षेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, महावितरण कंपनीला रत्नागिरी विद्युत निरीक्षण विभागाने अहवाल दिला आहे. यामध्ये देखभाल दुरुस्तीचा अभाव, विद्युतवाहक तुटल्याने तारमार्गास स्पेसर्स, गार्ड लूप न बसवल्याने, उपरीतार मार्गालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी न केल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या अहवालामध्ये या अपघाताला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वायरमन आणि शाखा अभियंता या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खुलाशानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महावितरणने दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 30/Jul/2025