रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाचा दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल २७.६५ टक्के व बारावीचा निकाल ३२.०५ टक्के लागला. रत्नागिरीमध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये एक गैरमार्ग प्रकरण उघडकीस आले.
लेखी परीक्षा २४ जून ते १४ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दहावीसाठी ४, सिंधुदुर्गमध्ये २ व बारावीसाठी ३ व २ परीक्षाकेंद्रे होती. दहावीसाठी १९१ जणांनी नोंदणी केली व १८८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यातील ५२ उत्तीर्ण झाले. हे प्रमाण २७.६५ टक्के आहे.
बारावीसाठी ३९८ जणांनी नोंदणी केली व ३९० जण परीक्षेस बसले. यातील १२५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ३२.०५ टक्के आहे.
उत्तरपत्रिका गुणपडताळणी, छायाप्रती व पुनर्मूल्यांकनाचा कालावधी ३० जुलै ते ८ ऑगस्ट आहे. याकरिता ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय ठेवली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे. श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यासाठी तीन संधी आहेत. यामध्ये मार्च २०२६, जून-जुलै व फेब्रुवारी-मार्च २०२७ उपलब्ध आहेत, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 30-07-2025














