रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा खडक मोहल्ला येथे एका मोबाईल शॉपीच्या फर्निचरचे काम सुरू असताना कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरकर वाडा खडक मोहल्ला येथे नव्याने सुरू होणाऱ्या मोबाईल दुकानाचे फर्निचरचे काम गोरखपूर येथील चार कामगार करत होते. या कामगारांमध्ये दोन मामा-भाचे होते. यात मामाच्या मुलीवर भाच्याचे प्रेम होते. याच प्रेमसंबंधातून मामा आणि भाच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मामाने सुतारकामासाठी वापरण्यात येणारे धारदार हत्यार भाच्याच्या छातीत खुपसले. यामुळे भाच्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांना ११२ क्रमांकावर फोन करून कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एक टीम घटनास्थळी तर दुसरी टीम रेल्वे स्थानकावर पाठवली. रेल्वे स्थानकावरून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














