Maharashtra Weather Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) नुसार 5 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील हवामानाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यानंतर राज्यातील काही अंशी भागांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान विभागाची एकूण माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
कोकण :
कोकण किनारपट्टीवर, विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 5 ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या मान्सूनची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे येथे सकाळी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर दुपारनंतर ढगाळ वातावरणाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भ :
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 5 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला. हवामान खात्याने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर येथे हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे हलक्या सरींसह ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचा साठा वाढला आहे. खडकवासला धरणातून मुळा-मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र :
मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगाळ वातावरण असून पावसाची कमी शक्यता आहे. तसेच नांदेड, धाराशीव, लातूर आणि हिंगोली येथे हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे येथे तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील. तापमानात किंचित घट होऊन उकाड्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 05-08-2025














