पावस : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले म्हणाले, संपूर्ण देशामध्ये ९.७० कोटी लाभार्थ्यांना २० हजार ५०० कोटी निधीचा लाभ पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये १.७२ लाख शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असून, २० व्या हप्त्यासाठी १ लाख ६१ हजार ११३ पात्र लाभार्थी आहेत. त्यांना जवळजवळ ३२.२५ कोटी रुपयांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा होणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २० व्या हप्ता लाभाचे वितरण कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे झाला. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकऱ्यांना नाचणे ग्रामपंचायतीच्या सभागृहात दाखविण्यात आले. या वेळी नाचणे उपसरपंच निलेखा नामदेव नाईक, सुचिता घडशी, शिवानी रेमुळकर, प्रशांत प्रकाश रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सोनोने आदी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनोने यांनी भौगोलिक परिस्थितीत चांगले उत्पन्न देणाऱ्या भात बियाण्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
आतापर्यंत एकूण १९ हप्त्यांमध्ये जिल्ह्यातील १,५८,२५९ लाभार्थ्यांना ६७२ कोटी रुपयांचे सन्मान निधी प्राप्त झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील १९,६५१ लाभार्थ्यांना २० व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये नाचणे गावातील १३९, तर व आंबेशेत गावातील २६८ पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर राज्य शासनाकडून आतापर्यंत नमो शेतकरी योजनेंतर्गत १८८.२६ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाले आहे. अॅग्रीस्टैंक योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. यापुढे अॅग्री स्टैंक नोंदणी नसल्यास कुठल्याही कृषीविषयक लाभ तसेच पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 05/Aug/2025














