गुहागर : जिल्हा नियोजन विभागाच्या निधी वाटपावरुन माजी आ. डॉ. विनय नातू खरं तेच बोलले आहेत. प्रत्येक तालुक्याला सम प्रमाणात निधी मिळावा, यासाठी माजी आ. नातू बोलले आहेत. मात्र पालकमंत्र्यांनी यावर मीडियासमोर कोण विनय नातू असे विधान केले तेच चूकच आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. गुहागर तालुक्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष आहे.
त्यामुळे जर युती झाली नाही, तर आणि वरिष्ठांचा आदेश आला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवून आम्ही आमची ताकद दाखवू. येथील स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी डॉ. विनय नातू यांना तुच्छ म्हणून हिणवले; मात्र भास्कर जाधव यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना २०२१ मध्ये मंत्रीपद मिळाले नाही यावरून त्यांना मिळालेली वागणूक व तुच्छपणा दिसून आला. ते गेले अनेक वर्ष भाजपावरच आरोप करत आहेत. गुहागर तालुक्यातील खोतकी नष्ट केल्याच्या आरोपावर मोरे यांनी सांगितले की, डॉ. तात्यासाहेव नातू यांनी स्वतः शाळा काढून संबंधित गावांना हस्तांतरित केल्या. त्या त्यांनी स्वतःच्या नावावर करून आपली खोतकी गाजवली असती; मात्र त्यांनी तसे केले नाही असे भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी गुहागर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, चिपळूण तालुका भाजपा अध्यक्ष उदय घाग, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर, माजी महिला आघाडी अध्यक्ष अपूर्वा बारगुडे, उपाध्यक्ष विनायक सुर्वे, उपाध्यक्ष आशिष विचारे, सचिन ओक, नरेश पवार, संतोष सांगळे यांच्यासह अनेक भाजपा तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 08/Aug/2025














