चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते; मात्र वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या गाडीच्या वेळापत्रकातील दीर्घ थांबे कमी करावेत, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.
मंगळवारी (ता. ५) रात्री १२.०७वाजता दादर रेल्वेस्थानकातून निघालेली तुतारी एक्स्प्रेस दुपारी १२.५९ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचली. ही गाडी केवळ ९ मिनिटे उशिरा धावत असल्याचे दाखवण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष प्रवासात वेळेचे नियोजन अत्यंत अकार्यक्षम होते.
तुतारी एक्स्प्रेस खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड आदी स्थानकांवर १० ते २० मिनिटे वेळेआधी पोहोचते. विशेष म्हणजे रत्नागिरी येथे ही गाडी नियोजित वेळेच्या तब्बल ६३ मिनिटे आधी सकाळी ७.५७ वाजता पोहोचते आणि त्यानंतर तब्बल ६८ मिनिटे तिथे थांबते. तुतारी एक्स्प्रेस ही कोकण रेल्वेमार्गावरील मुंबईशी जोडणारी नियमित गाडी आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी वेळापत्रकात योग्य त्या सुधारणा कराव्यात, अशी भूमिका प्रवासी संघटनांनी घेतली आहे.
या गाडीचे वेळापत्रक तयार करताना एखाद्या स्थानकात अधिक वेळ थांबा दिल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातो. रत्नागिरीसारख्या प्रमुख स्थानकावर ही गाडी तासभर थांबवण्याची गरज नाही, असे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 08/Aug/2025












