चिपळुणात आनंदयात्रीतून ‘पुलं’च्या स्मृतीला नमन

चिपळूण : पु. ल. देशपांडे यांच्या २५ व्या स्मृतीवर्षानिमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्यावतीने ‘आनंदयात्री पु. ल.’ या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक नाट्यप्रयोगाचे आयोजन बुधवारी रात्री इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात झाले. पु. ल. यांनी लिहिलेल्या नाट्यप्रवेश, नृत्य, गीत आणि व्यक्तिचित्रांचे सुरेख सादरीकरण या प्रयोगात करण्यात आले. चिपळूणमधील रसिकांनी स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ रंगकर्मी कांता कानिटकर यांच्या हस्ते रंगमंच पूजनाने झाली. त्यानंतर ‘नांदी’ सादर करण्यात आली. डॉ. प्रशांत पटवर्धन आणि स्नेहल जोशी यांनी अनुक्रमे पु. ल. आणि सुनीताबाईंच्या भूमिका साकारत ‘आनंदयात्री पु. ल.’ या प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर पु. ल. यांच्या रत्नागिरीत झालेल्या लग्नाचा प्रसंग सादर झाला. या प्रवेशात संजय सरदेसाई, मधुरा बापट, सुनेत्रा आपटे, श्रीकांत फाटक, संदीप जोशी, अजय यादव, मंगेश बापट, आदित्य बापट, शोम पाथरे आणि दिलीप आंब्रे यांनी भूमिका साकारल्या. यानंतर रंगमंचावर आले अंतू बर्वा आणि मध्यमवयीन पु. ल. देशपांडे. संतोष केतकर यांनी पु. ल. तर कांता कानिटकर यांनी अंतू बर्वा साकारला. दुकानदाराच्या भूमिकेत संजय कदम यांनी साथ दिली. ‘साक्ष’ या विनोदी प्रवेशात महाद्या या साक्षीदाराची भूमिका योगेश बांडागळे यांनी साकारली.

यानंतर ‘तुज आहे तुजपाशी’ या नाटकातील प्रवेश सादर झाला. दिग्दर्शक कांता कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता पालकर, रंजना वाडकर, संगीता जोशी, स्कंधा चितळे आणि श्रवण चव्हाण यांनी भूमिका साकारल्या. मंदार ओक दिग्दर्शित ‘ती फुलराणी’ हा प्रवेश सादर करण्यात आला. ऋचा भागवत हिने साकारलेली फुलराणी ही भूमिका रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. कार्यक्रमाच्या शेवटी पु. ल. आणि सुनीताबाईच्या मनोगतातून त्यांच्या सहजीवनाचा भावनिक पट सादर करण्यात आला त्याने कार्यक्रमाला गोड झळाळी दिली. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश गांधी व सोनाली खर्चे यांनी खुमासदार शैलीत केले. प्रकाशयोजना उदय पोटे, ध्वनी संयोजन कमलेश कोकाटे, पार्श्वसंगीत संस्कार लोहार व अतिश तांबे, नेपथ्य संतोष केतकर आणि रंगभूषा शेखर दांडेकर यांनी केली.

विद्यार्थी नाचले नाच रे मोरा गाण्यावर
दरम्यान, प्रेमजीबाई आसर प्राथमिक विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याचे दिग्दर्शन श्रीमती बेदरकर यांनी केले होते. मध्यंतरानंतर पुलंनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी सादर झाली. आनंद पाटणकर, अनामय बापट आणि अश्विनी वैद्य यांनी गाणी सादर केली तर त्यांना संगीतसाथ संतोष करंदीकर आणि अभय खांडेकर यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 08/Aug/2025