रत्नागिरी : पर्यावरण व घनकचरा व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक आहे. घरातील सगळा घनकचरा सुव्यवस्थितरीत्या वर्गीकरण करून द्यायला हवा. अनेक लोक कचरा रस्त्याच्या कडेला फेकतात यामुळे शहरेसुद्धा बकाल होत आहेत. त्यामुळे कचरा वर्गीकरण करून द्यावा व पर्यावरणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन रत्ना ग्रीनचे प्रमुख मनीष आपटे यांनी ‘निवृत्त तरी कार्यरत समूहाच्या’ स्नेहमेळाव्याप्रसंगी केले.
‘निवृत्त तरी कार्यरत’ या समूहाचा स्नेहमेळावा थिबा पॅलेस रोडवरील श्री गगनगिरी महाराज मठ येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून पर्यावरण व घनकचरा व्यवस्थापनावर आधारित मार्गदर्शन, करमणूक आणि कलाकौशल्य असे एकत्रीकरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देवी शारदेचा श्लोक म्हटला. यानंतर राष्ट्रसेविका समितीच्या सहबौद्धिक प्रमुख श्रेया सरदेशपांडे यांनी राणी दुर्गावतीची माहिती सांगितली. तिच्या पराक्रमाचे सविस्तर वर्णन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगाचे दाखले देऊन सांगितले.
माझी परसबाग या विषयी रश्मी गांगण यांनी अनुभव कथन केले. निवृत्तीनंतरच्या काळात घराला उपयोगी आणि स्वतः आनंदी राहता येईल व पर्यावरणपूरक अशी ही कल्पना आहे, हे लक्षात आणून दिले. राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यांनी मेळाव्याचा आढावा घेताना पर्यावरण, कुटुंब, पर्यायाने देश व धर्म यांच्यासाठी काय काय करू शकतो, हे सांगितले. उत्साह येण्यासाठी बौद्धिक व पारंपरिक खेळही त्यांनी घेतले. यानंतर थोडी पर्यावरणाची गाणी प्रज्ञा गोखले यांनी म्हणून घेतली.
मूकबधिर विद्यार्थ्यांची कलाकारी
मासुमा गोलंदाज व ऋणाली बडद या दोन मूकबधिर मुलीनी काही सुशोभनाचे पेपर क्राफ्ट व फुलपानांच्या रांगोळ्या यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले व नंतर वेगवेगळे क्राफ्ट कोर्सेस सामान्य मुलांच्या कॉलेजमधून यशस्वीरीतीने पूर्ण केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 08/Aug/2025












