Shiv Sena symbol and name dispute: शिवसेना पक्ष, चिन्ह वादाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच येणार?

Shiv Sena symbol and name dispute: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात 8 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

हे घटनापीठ राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यांवर 19 ऑगस्टपासून सुनावणी सुरू करणार आहे. या घटनापीठाचे न्यायमूर्ती सूर्यकांत सुद्धा भाग असणार आहेत. त्यामुळे शिवसेना वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात गेला आहे. संगणक प्रणालीत नव्याने तारीख 8 ऑक्टोबर देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजू सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय अंतिम फैसला करणार आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याची उत्सुकता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यामुळे सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर गेली. घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच निकाल येणार?

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून या प्रकरणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती करण्यात आली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, त्यामुळे आम्ही एकदाच काय ते या प्रकरणावर निकाल देऊ असं म्हणत हे प्रकरण लवकरात लवकर संपवणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर 20 ऑगस्ट तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना पक्ष चिन्हाचा अंतिम फैसला समोर येण्याची शक्यता आहे.

देशातली लोकशाही तडफडत आहे

दरम्यान, मार्मिकच्या 65व्या वर्धापनदिनी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालासाठी सरन्यायाधीशांना साकडे घातले. ते म्हणाले की, ‘आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडत आहे. तीन वर्षे झाली, चार वर्षे झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. एक सरन्यायाधीश झाले, दोन झाले, तीन झाले आणि आता आपण चौथे बसले आहात. त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचे पाणी नाही दिलंत तर देशातली लोकशाही मरेल. म्हणूनच खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यातदेखील लक्ष घाला, ही मी हात जोडून विनंती करतो,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी साप्ताहिक ‘मार्मिक’च्या वाटचालीची प्रशंसा केली. 65 वर्षापूर्वी एका व्यंगचित्रकाराने ‘मार्मिक’ नावाची ठिणगी टाकली आणि त्यातून शिवसेना नावाचा वणवा पेटला. त्यात महाराष्ट्रद्वेष्टे आणि मराठीद्वेष्टे जळून खाक झालेच, पण त्याच शिवसेनेने पुढे जाऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदूनाही वाचवले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 14-08-2025