Konkan Rain : कोकणात मुसळ’धार’, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; किनारपट्टीला अलर्ट

मुंबई : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे प्रमुख नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर; नद्या धोक्याच्या पातळीकडे

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने सर्वाधिक झोडपले असून, रात्रीपासून संततधार सुरू आहे. विशेषतः कणकवली तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, यामुळे गड नदी आणि जाणवली नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या नद्या इशारा पातळी ओलांडू शकतात, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना

या पार्श्वभूमीवर, तिन्ही जिल्ह्यांतील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आणि गरज पडल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तास कोकणासाठी महत्त्वाचे असणार आहेत. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 15-08-2025