PM Modi vs Owaisi: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख केला आणि संघाचे कौतुक केले.
पण आता विरोधकांनी यावरून त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संघ आणि पंतप्रधान यांच्यावर टीका केली आहे.
संघाच्या कार्यप्रणालीवर ओवेसींची टीका
असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडिया हँडल एक्स वर म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आरएसएसचे कौतुक करणे हे स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे. आरएसएस आणि त्यांचे वैचारिक सहकारी ब्रिटिशांचे पायदळ सैनिक म्हणून काम करत होते. त्यांनी कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. त्यांनी ब्रिटिशांना विरोध करण्यापेक्षा गांधींचा जास्त द्वेष केला, असा आरोप ओवेसींनी केला. ओवेसी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा आपल्याला खरा इतिहास वाचणे आणि देशाच्या खऱ्या नायकांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. जर आपण हे केले नाही, तर लवकरच भ्याडपणा आपल्याला शौर्य म्हणून दाखवला जाईल. ओवेसी म्हणाले की, आरएसएस आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणाऱ्या समावेशक राष्ट्रवादाच्या मूल्यांना नाकारण्याचे काम करते.
RSS चीनपेक्षा जास्त धोकादायक, मोदींनाही प्रश्न
हिंदुत्ववादी विचारसरणी बहिष्कारावर विश्वास ठेवते आणि आपल्या संविधानाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. मोदी नागपूरला जाऊन स्वयंसेवक म्हणून संघाचे कौतुक करू शकले असते. पंतप्रधान असताना त्यांना लाल किल्ल्यावरून असे का करावेसे वाटले? चीन हा आपला सर्वात मोठा धोका आहे, परंतु त्याहूनही मोठा धोका देशाच्या आतच आहे, तो म्हणजे संघ परिवार पसरवत असलेला द्वेष आणि फूट. आपल्या स्वातंत्र्याचे खरोखर रक्षण करायचे असेल तर अशा सर्व शक्तींना पराभूत केले पाहिजे, असे मत ओवेसींनी व्यक्त केले.
पंतप्रधानांनी ‘आरएसएस’बद्दल काय म्हटले?
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आरएसएसचे कौतुक केले आणि म्हटले की आरएसएसचा गौरवशाली इतिहास आहे. संघ ही जगातील सर्वात मोठी एनजीओ असेही त्यांनी म्हटले आणि त्यांच्या सर्व स्वयंसेवकांचे राष्ट्रसेवेबद्दल कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, १०० वर्षांपूर्वी एका संघटनेचा जन्म झाला, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाने वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्रनिर्माणाचा संकल्प घेऊन १०० वर्षे काम केले, असे कौतुक मोदींनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 15-08-2025














