रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मराठी पत्रकार परिषदेचे आज आंदोलन

रत्नागिरी : गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे महामार्गाची दुर्दशा आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली, पण कोणीही या महामार्गाचे काम पूर्ण केले नाही. प्रत्येक सरकारने केवळ आश्वासने दिली आणि नवनवीन तारखा जाहीर केल्या. यामुळे कोकणातील जनतेला अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. त्याचा त्यांना प्रचंड त्रास होत आहे.

या गंभीर प्रश्नावर मराठी पत्रकार परिषदेने पुन्हा एकदा आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निवळी येथे शांततेत निदर्शने करण्याचे ठरले असून या निदर्शनांमध्ये रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

तोंडावर आलेल्या गणपती सणापूर्वी महामार्गाची किमान तात्पुरती डागडुजी करावी. गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना चांगल्या रस्त्यावरून प्रवास करता यावा, हीच या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे.

वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता, रस्त्याच्या बाजूला उभे राहून निदर्शने केली जातील, असे पत्रकार परिषदेने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही परिषदेने या प्रश्नावर आवाज उठवला होता, पण सरकारकडून ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:40 16-08-2025