मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. माणगाव इंदापूर परिसरात तब्बल ४ किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागल्या होत्या. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सवानंतर मिळालेल्या तीन दिवसांच्या सुट्टीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले होते. सुट्टी संपत आल्यानंतर रविवारी सकाळपासून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे महामार्गावर तुफान कोंडी झाली आहे.
माणगाव रेल्वे स्थानक परिसरापासून ते मुगवली गावापर्यंत चार किलोमीटरचा प्रवास करण्यास वाहनधारकांना तासन् तास वेळ लागत आहे.

कोंडीमुळे महामार्गावरील एस.टी. बस, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक करणारी ट्रक-टेम्पो यांची मोठी गर्दी झाली आहे.
महामार्गावरील अनेक ठिकाणी वाहनं आडवी-तिडवी उभी राहिल्याने कोंडी अधिकच वाढली. पावसामुळे रस्त्यांवर निसरडेपणा असून त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.
या अनुषंगाने वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करून वाहनांना वळविणे, सिग्नलचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वाहनधारकांना करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 18-08-2025














