रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या ‘त्या’ अधिकाऱ्याचा कार्यभार काढून घेतला

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘तो’ शिक्षण विभागाचा अधिकारी पुन्हा वादात सापडला आहे. बोलण्यास नकार दिल्याने कायम बदल्या करून हा अधिकारी मानसिक त्रास देत असल्याची तक्रार एका शिक्षिकेने प्रशासनाकडे केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्या अधिकाऱ्याची चौकशी लावली असून, अहवाल येईपर्यंत त्याचा कार्यभार काढून घेतल्याचे पुजार यांनी सांगितले.

तालुक्यात गेल्या महिन्यात एका शाळेतील मुख्याध्यापिकेला संबंधित अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाला तोंड द्यावे लागले. २२ दिवस होऊनही त्यावर कारवाई झालेली नाही. शिक्षण विभागातील तो अधिकारी नेहमीच या ना त्या कारणाने वादात आहे. त्याच्या विरोधात २४ सप्टेंबरला पहिली तक्रार झाली; मात्र, संबंधित महिला मुख्याध्यापिकेला अजूनही न्याय मिळालेला नाही. याबाबत या शिक्षिकेने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या महिला शिक्षिकेने तो शिक्षणाधिकारी गैरवर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. अजून यावर निर्णय झाला नसताना आता पुन्हा दुसऱ्या एका शिक्षिकेने त्याच अधिकाऱ्याच्या विरोधात गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या शिक्षिकेने त्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. ऑफिसमध्ये अनेकवेळा बोलावून, नको त्या गप्पा करत असताना त्याला प्रतिसाद न दिल्याने राग धरून मानसिक त्रास देत आहेत. आतापर्यंत त्यांनी १५ वेळा माझी बदली केली आहे, असे या महिलेने तक्रारअर्जात नमूद केले आहे.

प्रशासनाकडून दखल…
याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्याची चौकशी लावली आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्याचा कार्यभार काढून घेतला आहे, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 19-10-2024