लांजा : साटवली गावात २० माकडे पिंजराबंद

लांजा : वनविभागाच्या वतीने साटवली गावात काल माकडे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी २० माकडे पिंजराबंद करण्यात आली. माकडे पकडण्याची तालुक्यातील ही पहिलीच मोहीम आहे.

गेल्या काही दिवसांपासून साटवली परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. लोकांच्या घरांवरील कौले व पत्रे यांच्या नुकसानीबरोबरच भाजीपाला, शेती आणि बागायती यांचीदेखील मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात होती. माकडांच्या टोळीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरीवर्ग पुरते हैराण झाले होते. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांच्यासह साटवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून वनविभागाने या ठिकाणी माकड पकडण्याची मोहीम राबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली जात होती आणि त्याबाबत वनविभागालादेखील कळवण्यात आले होते..

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वनविभागामार्फत माकडे पकडण्याची सकाळपासूनच साटवली परिसरात मोहीम राबवण्यात आली. वन्यजीव प्राणीमित्र समाधान गिरी (रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी अतिशय कुशलतेने माकडांना जेरबंद केले. या कामात त्यांना अमित लांजेकर, महेश धोत्रे, शाहिद तांबोळी यांनी मदत केली. ही संपूर्ण मोहीम विभागीय वनाधिकारी चिपळूण (प्रा) गिरिजा देसाई, सहा. वनसंरक्षक चिपळूण (प्रा) प्रियांका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल सारिक फकीर, वनरक्षक लांजा बाबासाहेब ढेकळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 19/Oct/2024