Maharashtra Monsoon Update: राज्याच्या 98 टक्के भागातून पाऊस ओसरला

पुणे : राज्यातील 98 टक्के भागातून गुरुवारपासून मोठा पाऊस ओसरला असून, आता फक्त काही जिल्ह्यांतच तुरळक ठिकाणी 25 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज आहे. राज्यातील ढग आता गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे.

गेले आठ दिवस कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. राज्यातील बहुतांश भागांत पूरस्थितीने हाहाकार निर्माण केला होता. मध्य महाराष्ट्रात असा पाऊस उशिरा सुरू झाला. या भागातही पूरस्थिती तयार झाली. 

त्यामुळे हा पाऊस कधी थांबतो अन् सूर्यदर्शन कधी होते, याचीच ओढ लागली होती. अखेर मोठा पाऊस गुरुवार (दि. 21 ऑगस्ट) पासून कमी झाला असून, शुक्रवारी मुंबई, पुण्यासह विदर्भातील काही भागांत पाऊस पडेल तसेच विदर्भात 25 पर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस (कंसात तारखा): ऑरेंज अलर्ट : पुणे घाट (25), सातारा घाट (25); यलो अलर्ट : रायगड (22 ते 25),

रत्नागिरी (22 ते 25), पुणे घाट (22 ते 24), सातारा घाट (23 व 24), अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, वर्धा (22, 24, 25)

गुरुवारपासून पुणे, शहर, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यातील सर्वंच भागातून पावसामध्ये लक्षणीय घट होण्यास सुरुवात होत आहे. दक्षिण किनारी ओडिशावर असलेला डिप्रेशन कमकुवत होत असून, वायव्य दिशेने सरकत आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस कमी होण्यास अनुकूल वातावरण तयार होत आहे. ढग गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबई, पुणे शहरासह काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल. – डॉ. अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 22-08-2025