राजापूर : दिवटेवाडीवासीयांची प्रभाग रचनेवर हरकत

राजापूर : राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत दाखल केली आहे. दिवटेवाडीला तीन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले असून, या विभाजनास ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवला.

दिवटेवाडीचे प्रभाग क्र. ८, ९ व १० अशा तीन भागांत विभाजन करण्यात आले आहे. वाडी ही लोकसंख्येच्या व भौगोलिकदृष्ट्या मोठी असली तरी ती किमान प्रभागांमध्ये विभागली जावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे; मात्र सद्यःस्थितीत तिचे विभाजन अधिक प्रभागांमध्ये करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे प्रभाग क्र. १० मधील मतदान केंद्र हे दिवटेवाडीपासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर लांब असून, दळणवळणासाठी अर्जुना नदी अडथळा ठरत आहे. सुबोध पवार, रमेश पवार, रामचंद्र पिठलेकर, अशोक तांबे, शिवराज पवार, भूषण आरेकर, स्वप्नज तांबे यांच्यासह एकूण नऊ ग्रामस्थांनी प्रभाग रचनेविरोधात हरकत दाखल केली असून, संबंधित निवेदन मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

लोकसंख्येचे प्रमाणही अपुरे
२०११च्या जनगणनेनुसार, राजापूर पालिकेची एकूण लोकसंख्या ९ हजार ७५३ इतकी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या सुमारे ९७५ अधिक १० टक्के म्हणजे ८७८ ते १०७२ दरम्यान असणे आवश्यक आहे; मात्र, प्रभाग क्र. १०ची लोकसंख्या १११९ असून ही मर्यादा ओलांडते. त्यामुळे ही रचना नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नैसर्गिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष
प्रभाग रचनेत अर्जुना नदीसारख्या नैसर्गिक अडथळ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. प्रभाग क्र. ९ मधील दिवटेवाडीचा काही भाग कोंढेतड या प्रभाग क्र. १० मध्ये समाविष्ट करण्यात आला असून, नदीमुळे दोन्ही भाग नैसर्गिकरीत्या विभक्त आहेत. परिणामी, येथील नागरिकांना दळणवळणात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 25/Aug/2025