मुंबई : राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विरोधक कितीही टीका करोत, पण महिलांसाठी सुरु केलेली कोणतीही योजना पुढील पाच वर्षे बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राज्यभरातील महिलांनी पाठविलेल्या हजारो राख्यांचा सोहळा शनिवारी पार पडला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बहिणींनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करून त्यांना आभार मानले. या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार चित्रा वाघ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार विद्या ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, “बहिणींच्या आशीर्वादाने 2029 मध्येही महाराष्ट्रात आमचेच सरकार सत्तेत येईल. महायुती सरकार महिलांच्या सहकारी संस्थांना हक्काचे स्थान देण्यासाठी कटिबद्ध आहे.”
बहिणींसाठीची कोणतीही योजना बंद होणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधक म्हणतात की लाडक्या बहिणींसाठीची योजना बंद होणार. पण मी आश्वासन देतो की, 2029 पर्यंत लाडक्या बहिणींसाठी असणारी कोणतीही योजना बंद होणार नाही. त्यानंतर आमचे सरकार आले तर या सर्व योजना पुढेही सुरू ठेऊ.”
व्होट चोरी म्हणणारे निर्बुद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या राख्या धर्म, जात, पंथाच्या पलीकडच्या आहेत. इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्याकडे आहे, अशा भावाला कुणाचीही भीती नसते. माझ्या लाडक्या बहिणींच्या मताला ‘व्होट चोरी’ म्हणणारेच खरे चोर आहेत. अशा निर्बुद्धांना अक्कल यावी म्हणून माझ्या बहिणींनी त्यांना 25 टक्के आशीर्वाद द्यावेत.’
देशातील मातृशक्ती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि महिलांच्या मान-सन्मानासाठी महायुती सरकार नेहमी कार्यरत राहील अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी राज्यभरातून तब्बल 36 लाख 78 हजार राख्या आल्या आहेत. देवाभाऊंनी केलेले अविरत कार्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हीच बहिणींची खरी भेट आहे असेही त्यांनी म्हटले.
आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, ‘देवाभाऊंनी महिलांना काम व दाम मिळावे यासाठी महिला सहकारी संस्थांची उभारणी केली. बहिणींच्या भल्यासाठी झटणारा असा भाऊ लाभणे म्हणजे भाग्य आहे.’
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 25-08-2025














