Breaking : खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची ‘मनसे’तून हकालपट्टी

मुंबई – खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि ३ जणांची मनसेतून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढले आहेत. मागील काही दिवसांपासून खेडेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.

त्यात आज सकाळपासून वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर असून लवकरच ते मनसेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याआधीच राज ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांचे कारण देत वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी केली आहे.

मनसेच्या पत्रात म्हटलंय की, पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने खेडचे वैभव खेडेकर, राजापूरचे अविनाश सौंदळकर, चिपळूणचे संतोष नलावडे, माणगावचे सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. या पत्रकावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची सही आहे.

कोण आहेत वैभव खेडेकर?

वैभव खेडेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत होते. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. खेड नगरपरिषदेत मनसेची सत्ता आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी ते खेडचे नगराध्यक्ष राहिले होते. वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष बराच काळ सुरू होता. परंतु हा संघर्ष कमी करत रामदास कदमांनी खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खेडेकर यांच्यावर सध्या मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची जबाबदारी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 25-08-2025