Chiplun: दोन दिवसात ३१ हजार चाकरमानी चिपळुणात दाखल

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील १५ हजार २०० गणेशभक्त दोन दिवसात एसटीने चिपळूणमध्ये दाखल झाले. मंगळवारी (ता. २६) आणखी ३०० एसटी एसटी चिपळुणात दाखल होणार आहेत. त्यातून सुमारे पंधरा हजार गणेशभक्त येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एसटीने यावर्षी तब्बल ३१ हजार २०० गणेशभक्त चिपळुणात दोन दिवसात दाखल झाले आहेत.

गणेशोत्सव म्हटले की, कोकणात जाणाऱ्‍यांची संख्या प्रचंड वाढते. आपल्या गावी बाप्पाच्या दर्शनासाठी, कौटुंबिक भेटीसाठी आणि सणाचा आनंद लुटण्यासाठी हजारो लोक मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा शहरांतून कोकणाकडे धाव घेतात; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासात तिकिटांची टंचाई, गाड्यांची गर्दी, वाहतुकीचा ताण यामुळे प्रवास त्रासदायक होतो. या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) गणेशभक्तांचा प्रवास सुकर करण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. मोठ्या शहरातील गणेशभक्तांना घेऊन आलेल्या एसटी रविवारी सकाळपासून बसस्थानकावर पोहचण्यास सुरुवात झाली. या बसेसचा आवाज, प्रवाशांच्या गर्दीची लगबग आणि बसस्थानकावरील हालचालींनी परिसरात उत्साही वातावरण तयार झाले आहे. ग्रुप बुकिंगवर आधारित विशेष बसेस रविवारी सकाळपासून तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रवाशांना सोडून पुन्हा परतीच्या मार्गावर निघाल्या. त्यामुळे रविवारी सायंकाळपासून तालुक्यातील अनेक मार्गावर एसटी धावताना दिसत होती. चिपळूण शहरातून जाणाऱ्या मार्गावरही एसटीच्या फेऱ्या धावताना दिसत होत्या. मध्यवर्ती बसस्थानक आणि शिवाजीनगर बसस्थानकावर प्रवाशांना सोडल्यानंतर वाहनचालक आणि वाहक विश्रांती घेऊन पुन्हा माघारी परतत होते. त्यामुळे चिपळूणमधून मोठ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली. जी वाहने ग्रामीण भागात गेली होती त्या वाहनांमधून प्रवासी शहराकडे येत होते. जादा बस घेऊन आलेल्या चालक-वाहकांनी टप्पा वाहतूक टाळली.

चिपळूण शहरात प्रवेश केल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी सर्व बसेस शिवाजीनगर बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. दुपारी आणि रात्री महामार्गावर कमी वाहतूक असते. त्या वेळी या बस सोडल्या जात होत्या.

चिपळुणात आगारात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. प्रचंड प्रमाणावर आलेल्या बसेस, त्यांचे चालक आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन, प्रवाशांची सोय यासाठी मोठ्या प्रमाणावर समन्वयाची गरज असते. चालक व कर्मचाऱ्‍यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज कोणत्याही अडचणीशिवाय पार पडत आहे. हजारोंच्या संख्येने प्रवासी येत आहेत. त्यांना घेऊन १२०० कर्मचारी आले आहेत. थोडीफार गैरसोय झाली तरी प्रत्येकजण समजून घेत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 26-08-2025