रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शेतकरी बांधवांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्सवासाठी गावी आलेल्या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करून फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन केले.
पिकविमा, फळपिकविमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पीएम किसान योजना आदी लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे तसेच केंद्र शासनाने पीएम किसान योजनेमधील लाभार्थी यांना अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने गणेशोत्सवासाठी गावाला येणाऱ्या गणेशभक्तांनी आणि बाहेरगावी असणाऱ्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेतील नोंदणी पूर्ण करून फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणीसाठी mhfr.agristack.gov.in पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच सीएसी केंद्र आणि कृषी विभाग/महसूल विभाग /ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू असल्याने त्यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी.
केंद्र सरकारमार्फत जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पोर्टलची सुरुवात केली आहे. या पोर्टलमध्ये अॅग्रीस्टॅक डाटा प्रणालीच्या पोर्टलचे एकात्मीकरण केले असून, पात्र शेतकऱ्यांना पारदर्शकसुलभ व कागदविरहित पद्धतीने पीककर्ज मंजुरी करता येणार आहे. या प्रणालीद्वारे पीककर्ज मंजुरीसाठी पात्रता निकष आहेत. त्याची पूर्तता करावी. केवळ वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा सीएसीधारकांकडून जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:50 PM 28-Aug-2025














