Ratnagiri ZP Teacher : जिल्हा परिषदेच्या ४६४ प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण

रत्नागिरी : बदलीसाठी पात्र नसतानाही अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त असलेल्या पदावर बदली होणार असल्याने काही शिक्षकांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहेत. त्यामुळे न्यायालयाने सातव्या टप्प्यातील बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे या बदल्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना उजाडला. संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षावरील शिक्षक यांचा समावेश होता. त्याचबरोबर संवर्ग २ म्हणेजेच पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्रसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले तसेच संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी ग्राह्य धरण्यात आली. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश करण्यात आला.

एकाच शाळेत पाच वर्षे काम आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार १०० शिक्षक बदलीपात्रच्या यादीत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत ४६४शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. उर्वरित सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवली जात आहे. यात अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त पदे बदलीने भरण्यात येणार आहेत; मात्र ही बदली प्रक्रिया करताना एकाच शाळेत पाच वर्षे पूर्ण न झालेल्या शिक्षकांना तेथे जावे लागणार, हे लक्षात आल्यानंतर काही शिक्षक न्यायालयात गेले. न्यायालयाने सातव्या टप्प्यातील बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:07 PM 29-Aug-2025