मुंबई : गणेशोत्सव संपताच मुंबईकरांना दसरा आणि दिवाळी सणाचे वेध लागतात. हे दोन्ही सण मुंबईसह देशभरात मोठ्चा उत्साहात साजरा केले जातात. यंदा दसरा २ ऑक्टोबरला तर दिवाळी २२ ऑक्टोबरला आहे.
यासाठी रेल्वेचे तिकीट आतापासूनच फुल्ल झाले आहे. सणाला बराच अवधी असला तरी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे. परिणामी बहुतेक गाड्यांवर ‘वेटिंग’ किंवा ‘फुल्ल’ असा संदेश प्रवाशांना दिसत आहे.
मुंबईतून दसरा-दिवाळीच्या काळात प्रवाशांचा ओढा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह उत्तर भारताकडे असतो. कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हजारो बुकिंग प्रवाशांनी वेबसाइट आणि तिकीट काउंटरवर प्रयत्न केले; परंतु बुकिंग सुरू होताच काही क्षणांतच सीट बुक झाल्या.
राज्यासह उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनना पसंती
विदर्भ एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस, कोलकाता मेल, महानगरी एक्स्प्रेस, एलटीटी-पाटणा एक्स्प्रेसचे बुकिंग सुरू होताच आरक्षण फुल्ल झाले.
२ विशेषतः दिवाळीला मुंबईहून बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांतील स्लीपर कोचमध्ये एकही जागा शिल्लक राहिली नाही. अशा परिस्थितीत आता प्रवाशांना रेल्वेने जाहीर करावयाच्या विशेष गाड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या तारखांचे आरक्षण फुल्ल
३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर
१८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर
गेल्या वर्षी सोडलेल्या ट्रेन
मध्य रेल्वे – सुमारे २५०० (दोन्ही दिशेला)
पश्चिम रेल्वे – सुमारे २७०० (दोन्ही दिशेला)
आरक्षित, अनारक्षित गाड्यांचा समावेश
दिवाळी आणि छठ पूजेसाठी लवकरच आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली जाणार आहे. जेणेकरून लोकांचा प्रवास आनंददायी आणि सुरक्षित होईल. गेल्या वर्षीही मध्य रेल्वेने सुमारे २५०० विशेष गाड्या चालवल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 30-08-2025














