रत्नागिरी : गेल्या तीन वर्षांपासून आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीत सागर महोत्सव साजरा होत आहे. केवळ उत्सव म्हणून नव्हे तर सागर आणि त्याच्या परिसंस्थेची जाणीवपूर्वक ओळख करून देणारा आणि त्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले टाकणारा उपक्रम म्हणून हा महोत्सव खूप आवश्यक आहे. लवकरच म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासूनच चौथा सागर महोत्सवातील विविध कार्यक्रम सुरू होणार आहेत. जबाबदार पर्यटन हा मुद्दा लक्षात घेत पथनाट्ये आणि सागरी किल्ल्यांचा वनस्पती, प्राणीजीवनाचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू होऊन महोत्सवात सागर आणि निसर्ग सान्निध्यात ‘जबाबदार पर्यटन’ या विषयावर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. जंजिरापासून उत्तरेकडील उंदेरी, खांदेरी, कुलाबा (अलिबाग), जंजिरा, पद्मदुर्ग, अर्नाळा या सहा सागरी किल्ल्यांवर पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमधील सागरी वनस्पती आणि प्राणीजीवनाचा अभ्यास करण्यात येणार आहे तसेच सागरतज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्यानं, पुळणी व खडकाळ किनाऱ्यांच्या अभ्यासफेऱ्या, खारफुटीच्या परिसंस्थेची सहल आणि महाविद्यालयीन स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सागराची जपणूक करा
आजची परिस्थिती अशी आहे की, सागर जसा आहे तसा जरी टिकवता आला तरी ती मोठीच गोष्ट ठरेल. कारण, सागरात अशी शक्ती आहे की, तो क्षणात संपूर्ण पृथ्वीला आपल्या कवेत घेऊ शकतो हे जाणून त्याच्याशी सन्मानाने, जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने वागणं अत्यावश्यक आहे. सागर महोत्सव हा फक्त एक उपक्रम नाही तर भविष्यासाठी एक संकल्प आहे. सर्वांनी सहभाग घेऊन सागराची जपणूक करावी, असे आवाहन आसमंत फाउंडेशनने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:09 PM 01-Sep-2025












