रत्नागिरी विधानसभा मतदार : बाळ माने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता?

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उदय सामंत रिंगणात उतरणार असून महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाच्या उमेदवारीची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र, निष्ठावंतांनाच उमेदवारीच्या मागणीमुळे या ठिकाणी उदय बने, राजू महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे. उबाठाकडून बाळ मानेंच्याही नावाची चर्चा असली तरी निष्ठावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास भाजपचे माजी आमदार बाळ माने हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभेत तिरंगी लढतीची चर्चा आता रंगू लागली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात कोण, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. महाविकास आघाडीकडून ‘उबाठा’चा उमेदवार रिंगणात उतरणार असून, सध्या भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांच्यासह माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने व माजी जि.प. अध्यक्ष राजू महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातही उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंतांनाच या निवडणुकीत संधी द्यावी, आम्ही जीवतोडून काम करू, असे ‘उबाठा’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन सांगितले आहे. निष्ठावंतांना संधी मिळावी, यासाठी खा. संजय राऊत, माजी खा. विनायक राऊत यांच्याही भेटीगाठी पदाधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे उदय बने किंवा राजू महाडिक या दोन नावांवर उबाठाकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यातही पक्षाने अन्य उमेदवार दिल्यास त्याचे काम करू, असे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सांगितले आहे. परंतु, निष्ठावंतांनाच संधी मिळेल, अशी आशा या पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याने, महाडिक की बने याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार बाळ माने यांनी ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा अधिक झाली. त्यानंतर रत्नागिरीत आलेल्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा चव्हाण यांनी बाळ माने भाजप सोडणार नाहीत असे स्पष्ट केले होते. त्यानंतर बाळ माने यांनी विधानसभा मतदार संघात दौरा करून कार्यकत्यांचा कौल आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उबाठाकडून संधी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उबाठाकडून निष्ठावंतांना उमेदवारी मिळणार की बाळ मानेंना याचा निर्णय येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता असल्याचे शिवसेना ‘उबाठा’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेदवार कोणीही असला तरी प्रामाणिकपणे काम करणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने जोरदार रणनीती राबवण्यास सुरुवात केली असून २१ ते २३ पुढील तीन दिवसांत जिल्हा परिषद गटनिहाय मतदारसंघ ढवळून काढण्यात येणार आहे. उमेदवार कोणीही असला तरी त्याचे काम प्रामाणिकपणे करण्याचा निर्णय रविवारच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी गावखडी, पावस, गोळप, शिरगाव, कुवारबाव, मंगळवारी हरचिरी, कोतवडे, मालगुंड, करबुडे, मिरजोळे गटात तर बुधवारी वाटद, हातखंबा, पाली, नावडी, फुणगूस व रत्नागिरीत शहरात बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 21/Oct/2024