Ratnagiri : रत्नागिरीतील सोळकोबा, बाळकोबा गणपतींचे विसर्जन

रत्नागिरी : शहरातील मांडवी येथे जवळपास १००हून अधिक वर्षांची परंपरा लाभलेले, नवसाला पावतात अशी ख्याती असलेला आणि वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणूक असणारे दोन गणपतींचे मंगळवारी भरपावसात विसर्जन झाले. शिवलकर कुटुंबीयांकडे या दोन गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते.

मांडवी येथे गणेशचतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केले जाणारे गणपती काढण्यासाठी दोन महिने लागतात. मांडवीतील शिवलकरांच्या घरी ओटी भरून राहील एवढे हे मोठे गणपती देखणे आहेत. या दोन्ही गणपतींना मोठी परंपरा लाभली आहे. नवसाला पावत असल्याने अनेक भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. घरगुती असले तरीही या गणपतींना जणू काही सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. मांडवी येथे शिवलकर बंधूंच्या घरी या गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. सुधाकर शिवलकर यांच्या घरी सोळकोबा आणि रूपेंद्र शिवलकर यांच्याकडे बाळकोबा मूर्ती विराजमान झाली. सोळकोबा व बाळकोबा या दोन्ही मूर्ती अवाढव्य आणि वजनदार असतात. या गणपतींचे विसर्जन मांडवीच्या समुद्रात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पाऊस असला तरीही भक्तांचा उत्साह अवर्णनीय होता. रत्नागिरीकरांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

अशी आहे विसर्जनाची पद्धत
दोन्ही गणपतींच्या विसर्जनाची आगळी पद्धत आहे. दोन्ही मूर्ती मोठ्या आकाराच्या, उंचीच्या असल्याने त्या नेण्यासाठी चाळीस, पन्नास लोकांची गरज असते. चाळीस फुटी सागवानी वाशांवर या मूर्ती ठेवल्या जातात. विसर्जनासाठी एकदा मूर्ती उचलल्यानंतर त्या मांडवी समुद्रकिनाऱ्‍यावर नेईपर्यंत कोठेही खाली ठेवल्या जात नाहीत. त्यानंतर मांडवी किनाऱ्यावर आरती म्हटल्यानंतर प्रार्थना करून समुद्रात नेण्यात येते. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:24 04-09-2025