रत्नागिरी : जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने मालमत्ता व शेतीचे मोठे नुकसान केले.
तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी सुरू झालेल्या वादळी पावसानेही जिल्ह्यातील घरे, गोठे, जनावरे आणि सार्वजनिक मालमत्ता मोठ्या प्रमाणात बाधित झाली. यामध्ये ११९.७३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, आजवर साडेतीन महिन्यांच्या पावसामुळे जिल्ह्यात साडेदहा कोटींहून अधिक नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.
यंदा २० मेपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मे महिन्यातच पडझडीला प्रारंभ झाला होता. जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी होता; मात्र, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून, साधारणतः १३ ऑगस्टपासून पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी मे महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
गेल्या साडेतीन महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घर, गोठे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तांचे आणि शेतीचे नुकसान केले. तीन व्यक्तींचा बळी गेला, नऊ जण जखमी तर १२ जनावरे दगावली आहेत तसेच ३९२ शेतकऱ्यांच्या ११९.७३ हेक्टरवरील शेतीचे १० लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही रक्कम १० कोटी ६२ लाख ५४ हजार ७७९ इतकी आहे.
पावसामुळे झालेले नुकसान असे
बाधित घरे (४३८)* ३ कोटी ५१ लाख ५५ हजार ८३३
बाधित गोठे (९४)* ४१ लाख ७१ हजार ८२६
सार्वजनिक मालमत्ता (१३५) नुकसान
शाळा १५* २७ लाख ४० हजार ७००
अंगणवाडी ३* ४ लाख ६८ हजार ८२५
रस्ते व संरक्षक भिंत ३९* २ कोटी ७६ लाख ११ हजार
पूल व मोऱ्या ६* ६६ लाख
साकव ६* १ कोटी ४५ लाख ५० हजार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 11-09-2025














