संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आधीच संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. संगमेश्वर भागातील विविध बसथांब्यांजवळील फलकांवर गावांची चुकीची नावे लिहिली गेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर तालुक्यातील महसुली नोंदीनुसार गावाचे नाव ‘निढळेवाडी’ असतानाही फलकावर निघळेवाडी असे लिहिले आहे तर गावमळाचे नाव गावमाला असे लिहिले आहे. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. फलक हे गावाचे ओळखपत्र असते.
आमच्या गावाची ओळख चुकीच्या पद्धतीने दिली जात आहे, असे नागरिकांनी संबंधितांना सांगितले. फलक लावताना जबाबदारीने आणि शासकीय नोंदींची पडताळणी करूनच काम करणे अपेक्षित आहे; मात्र सध्या नावांमध्येच गोंधळ असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात प्रशासनाने त्वरित दखल घेऊन चुकीचे फलक हटवून योग्य नावांचे फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण संथगतीने सुरू आहे. या मार्गावर दरवर्षी पडणारे खड्डे हे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहेत. त्यात गावांच्या नावांच्या फलकांची भर पडलेली आहे- राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 13/Sep/2025














