सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतालचा पदपथ १४ व १५ जून २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता. त्यानंतर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खचलेल्या पदपथाखालील मुरूम पुन्हा भरून, दबाई करून त्यावर सोलिगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
सभोवतालचे जांभ्याचे पदपथही पूर्ववत बसविण्यात आले आहे. यासोबतच चबुतऱ्याची दुरुस्ती, जलनिस्सारण व इतर अनुषंगिक दुरुस्तीची कामे अंतिम टप्यात आहेत.
दुरुस्तीची कामे अद्याप सुरू असल्याने राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सद्यस्थितीत खुला ठेवणे शक्य नाही. त्यामुळे दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर तज्ज्ञांकडून संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र प्राप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येईल. त्यानंतर राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची परवानगी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त होताच सुरू करण्यात येईल अशी माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई यांनी दिली.
किल्ला पर्यटकांसाठी सुरू करण्यासंदर्भात पुढील माहिती सावंतवाडी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत यथावकाश प्रसिद्धी पत्रकाद्वारे योग्यवेळी कळविण्यात येईल असेही इंगवले यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 13-09-2025














